सध्या सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताकडून ८०४ खेळाडूंचे भरगच्च पथक पाठवण्यात आले आहे. एकूण ४५ हून अधिक देशांचे खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. या खेळाडूंमध्ये भारताचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत असून छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ४७व्या मन की बात कार्यक्रमात ते बोलत होते.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. वुशू आणि रोविंग यासारखे तुलनेने कमी परिचयाचे असलेले खेळ आता भारतीय खेळाडूंच्या काम्हगिरीमुळे देशभर समजू लागले आहेत. त्या खेळांची नव्याने ओळख होऊ लागली आहे. त्या बरोबरच सध्या पाठविण्यात आलेल्या खेळाडूंच्या पथकात १५-१६ वर्षांची चुणचुणीत आणि प्रतिभावान खेळाडूदेखील आहेत. यावरून भारताचे भविष्य किती उज्ज्वल आहे, ते समजून येते.

पदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये छोट्या गावातील किंवा खेड्यातील खेळाडूंचा समावेश आहे, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे आणि मला त्याचा आनंद वाटतो, असेही ते म्हणाले.

या बरोबरच येत्या २९ तारखेला राष्ट्रीय खेळ दिन आहे. दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या पंतप्रधानांनी लागू शुभेच्छा दिल्या. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले आणि उर्वरित खेळांसाठी सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.