महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील असमानता दूर करण्यासाठी आपपाल्यापरीने प्रयत्न केले. बाबासाहेबांनी तर देशाला संविधान दिले, सर्वांना बरोबरीचा अधिकार दिला. पण सध्या आपल्या देशात महापुरुषांच्या नावावरुन राजकारण सुरु असून समाजाला तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील मगहर येथे संत कबीर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आज असे काही पक्ष आहेत ज्यांना शांतता आणि विकास नको असून अशांतता हवी आहे. देशात अशांतता राहिली तर आपला फायदा होईल असे त्यांना वाटते. या लोकांना आपल्या देशाचा स्वभाव ठाकाऊ नाही असे मोदी म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी देशात आणीबाणीला ४३ वर्ष पूर्ण झाली. ज्यांनी देशाता आणीबाणी लागू केली आणि ज्यांनी विरोध केला ते आज एकत्र आहेत. त्यातून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते असे मोदी म्हणाले. त्यांना देशाचे कल्याण दिसत नाही फक्त स्वत:चे आणि कुटुंबाचे भले दिसते असे मोदी म्हणाले.

मगहर येथे पोहोचल्यानंतर मोदी यांनी संत कबीर यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संत कबीर यांची आज ६२० वी पुण्यतिथी आहे. मोदींनी आपल्या भाषणातून संत कबीरांच्या कार्याचे गुणगान करताना त्यांनी समाजाला कशी दिशा दिली ते समजावून सांगितले. कबीरांना समजून घेण्यासाठी कुठल्या शब्दकोषाची गरज नाहीय. त्यांची तुमच्या-आमच्यासारखीच सोपी भाषा होती असे मोदी म्हणाले.