“आपल्या देशातील तरुणांना योग्य व्यवस्थाच आवडते. ते अशा व्यवस्थेसोबत असतात. या तरुणांना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड आहे. जातीवाद, घराणेशाही त्यांना आवडत नाही,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते देशातील जनतेशी संवाद साधत आहेत.

पंतप्रधान म्हणाले, २०१९ या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. त्यानंतर आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करणार नाही, तर नव्या दशकात प्रवेश करणार आहोत. या दशकात देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये त्या लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे ज्यांचा जन्म २१व्या शतकात झाला आहे. सध्या देशातील तरुणांना अशी व्यवस्था हवी आहे ज्यामध्ये अराजकता, जातीयवाद आणि घराणेशाही नको. अशीच व्यवस्था त्यांना आवडते आणि याच व्यवस्थेसोबत ते असतात.

“स्वामी विवेकानंद म्हणायचे की, तारुण्याची किंमत ठरवली जाऊ शकत नाही. हा जीवनातला सर्वात मौल्यवान कालखंड असतो. या काळात तुम्ही तुमचे आयुष्य कसे जगता त्यावरच तुमचा भविष्यकाळ अवलंबून असतो. त्यामुळे कॉलेजमधल्या स्नेहसंमेलांसारख्या उपक्रमातूनही तुम्ही समाजासाठी मोठे काम करु शकता, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी बिहारच्या पश्चिमगंज जिल्ह्यातील भैरवगंज हेल्थ सेंटरचा यावेळी आवर्जुन उल्लेख केला. या हेल्थ सेंटरमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून जनतेसाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय हे काम चालते आणि ते अंत्यत आदर्शवत काम असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

२०२२ सालापर्यंत स्वदेशीचा संकल्प करा

यावेळी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला. यासाठी त्यांनी देशवासियांना विचारले की, २०२२ सालापर्यंत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनामित्त आपण हा संकल्प करु शकतो का? की, या दोन-तीन वर्षात मी स्थानिक उत्पादनं खरेदीसाठीच आग्रही राहणार. भारतात तयार झालेल्या ज्यांमध्ये आपल्या देशवासियांच्या घामाचा गंध असेल अशा वस्तू खरेदी करण्याचा आपण आग्रह करु शकतो का? जम्मू-काश्मीरमधील हिमायत हा कार्यक्रम त्याच्याशीच जोडलेला असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.

सूर्याच्या अभ्यासासाठी इस्त्रो ‘आदित्य’ उपग्रह सोडणार

भारतात खगोलशास्त्राचा खूपच प्राचीन आणि गौरवाशाली इतिहास आहे. जेवढी जुनी आपली संस्कृती आहे तेवढ्याच आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांशी असलेला आपला संबंध प्राचीन आहे. आर्यभट यांनी सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाची विस्ताराने व्याख्या केली आहे. भास्करसारख्या त्यांच्या शिष्याने हे ज्ञान पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले. केरळमधील संगम गावाताली माधव यांनी ब्रह्मांडात असलेल्या ग्रहांच्या स्थितीच्या गणणेसाठी कॅलक्युलसचा उपयोग केला. इस्त्रोजवळ ASTROSAT नावाचे एक अंतराळ उपग्रह आहे. सूर्यावर अभ्यास करण्यासाठी इस्त्रो आदित्यच्या नावाने आणखी एक उपग्रह लॉन्च करणार आहे. त्यामुळे खगोलशास्त्राबाबत आपले प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान आपल्याला समजण्यास मदत होईल.