पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.

आणखी वाचा- अयोध्या : पंतप्रधान मोदींनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा दाखला, म्हणाले…

शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींकडून रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. “आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ – मोहन भागवत

“हे राम मंदिर राष्ट्रीय भावनेचं तसंच संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल. याशिवाय कोटी लोकांच्या सामूहिक संकल्पतेचं प्रतिक असेल,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “येणाऱ्या पिढीसाठी हे मंदिर आस्थेचं प्रतिक असेल,” असंही ते म्हणाले आहेत. “राम मंदिराकडून आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा मिळत राहील,” असंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली – योगी आदित्यनाथ

“राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य अर्पण केलं. राम मंदिरसाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो. या मंदिरासोबत फक्त इतिहास रचला जात नसून इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- राम मंदिर भूमिपूजनच्या सगळ्या बातम्या एकाच क्लिकवर

“करोनाच्या संकटकाळात मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मर्यादा आल्या आहेत. प्रभू श्रीरामाच्या कामात जी मर्यादा अपेक्षित असते त्या मर्यादेचं दर्शन या कार्यक्रमात दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही ही मर्यादा देशामध्ये दिसली,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

“जेव्हा जेव्हा माणुसकीने प्रभू रामचंद्रांना मान्य केलं आहे तेव्हा विकास झाला आहे. जेव्हा आपण भटकलो आहोत तेव्हा विनाश झाला. आपल्याला सर्वांच्या भावनांची काळजी घ्यायची आहे. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन, विश्वास घेऊन विकास करायचा आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.