पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. याच मुलाखतीत संजय राऊत यांनी प्रश्न विचारला की ममता बॅनर्जी असतील किंवा ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते असतील ते कायम असा आरोप करतात की नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करतात. फोडाफोडीचं राजकारणही केलं जातंय मध्यप्रदेश हे त्याचं ताजं उदाहरण आहे..या प्रश्नावर शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.

काय उत्तर दिलं शरद पवार यांनी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. सत्तेचा गैरवापर करत आहेत हे सरळसरळ दिसतंय. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही. त्या काळात ज्यावेळी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक असे त्यावेळी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात नरेंद्र मोदी टीका करत असत. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो हे आम्ही पाहिलं नव्हतं.

आणखी वाचा- “प्रियंका गांधींना निवासस्थान सोडायला सांगणं हे मोदी सरकारचं क्षुद्र राजकारण”

आणखी वाचा- …त्यावेळी मोदी मनमोहन सिंग यांच्याबद्दल इतकं कठोर बोलायचे की विचारू नका; सूडाच्या राजकारणावर पवारांचं उत्तर

मनमोहन सरकारमध्ये मी कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातलाही काही वेळा जाणं झालं. ज्यानंतर काँग्रेसमधल्या काही मंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, ते म्हणू लागले की मोदी इतकी टीका मनमोहन सिंग यांच्यावर करत आहेत तर भारताचे कृषीमंत्री गुजरातचा दौरा का करतात? त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी सांगितलं की गुजरातही आपल्या देशाचा भाग आहे.आपण सगळ्या देशाची हिताची जपणूक करण्यासाठी बसलो आहे. त्यामुळे शरद पवार जे करत आहेत ते योग्य आहे. हे धोरण कुठे आणि आजचं धोरण कुठे? आज याच्या उलट परिस्थिती आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथे फोडाफोडी करा.. याचं सरकार पाड, त्याचं सरकार पाड. राजस्थानमध्येही काहीतरी प्रयोग सुरु केले आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या धोरणात कमालीचा फरक जाणवतो. ” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता शरद पवार यांनी केलेल्या या टीकेला भाजपाकडून काही उत्तर दिलं जातं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.