पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हा मोहम्मद बिन तुघलकासारखा आहे. तर अजय सिंग बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ हे औरंगजेबासारखे वागत आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. मोदींना या देशात तालिबानी व्यवस्था आणायची आहे का? तालिबानी व्यवस्थेने भारतीय लोकशाही कशी काय चालेल? असाही प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला आहे. या दोघांनाही देशात हुकुमशाही आणायची आहे का? असेही त्यांनी विचारलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणातून विरोधकांवर ज्याप्रकारे तुटून पडतात त्यावरून त्यांची मानसिकता तुघलकी आहे असेच दिसते आहे. आपल्या सहकाऱ्यांचेही ते ऐकून घेत नाहीत. तसेच विरोधकांबाबत त्यांना अजिबात आदर नाही. राजकीय द्वेषातून ते विरोधी पक्षांना कायम टार्गेट करत असतात असाही आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखीच मानसिकता योगी आदित्यनाथ यांचीही आहे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्र्याला शोभेल अशी भाषा त्यांच्या तोंडी नाही असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. बुलंदशहरमध्ये जो हिंसाचार उसळला त्याबाबत तुम्हाला काय वाटते? असाही प्रश्न सुरजेवालांनी उपस्थित केला. सुबोध सिंह या पोलीस निरीक्षकाचा बळी गेला. त्यांचे खुनी कोण आहेत हे शोधले गेले पाहिजे अशीही मागणी सुरजेवालांनी केली. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक वक्तव्ये करताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे योगी आदित्यनाथही अशीच काहीशी वक्तव्ये करत आहेत ज्यावर आता सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.