बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षाही जास्त जागा मिळाल्या असल्याने महाराष्ट्राप्रमाणे मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच होईल अशी चर्चा रंगली आहे. मात्र भाजपा नेत्यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्यासंबंधी सूचक विधान केलं आहे. बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजपाकडून सेलिब्रेशन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील यावेळी उपस्थित आहेत.

“बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ता नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएनच्या कार्यकर्ता आणि बिहारमधील जनतेसोबत विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु,” असं सांगत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं आहे.

“आधी बिहारमध्ये निवडणूक झाली की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत असता. पण आता निवडणूक किती वाढलं अशा बातम्या येतात. एकीही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही देशाची ताकद आहे. ही निवडणूक करणं सोप्प नव्हतं. पण आपण जगाला भारताची ताकद दाखवली आहे,” असं मोदींनी यावेळी म्हटलं. नरेंद्र मोदींनी यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना विजयाचं श्रेय देत ‘जे पी नड्डाजी आगे बढो, हम आपके साथ है’ अशी घोषणाही दिली.

“मला इशारा देण्याची गरज नाही,” भरसभेत मोदी संतापले; जाणून घ्या नेमकं काय झालं
बिहारमध्ये सत्य आणि विश्वासाचा विजय झालाय – नरेंद्र मोदी

“जो निकाल आला आहे त्याचा मोठा अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले होते त्याचा हा व्यापक विस्तार आहे. भाजपा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे ज्याचा झेंडा संपूर्ण देशवासियांनी देशभर फडकावला आहे. कधी काळी आपण दोन जागांवर होतो. दोन खोल्यांमधून पक्ष चालवला जात होता. आज भारताच्या प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. प्रत्येकाच्या ह्रदयात आपण पोहोचलो आहोत. याचं उत्तर कालच्या निकालाने दिलं आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.

“देशाच्या विकासाचं काम करेलं त्यालाच सेवा करण्याची संधी मिळेल हे देशवासियांनी सांगितलं आहे. इतर राजकीय पक्षांनाही देशहिताचं काम करण्याचा संदेश दिला आहे. विकास हाच मुख्य मुद्दा आहे,” असंही मोदींनी म्हटलं. “देशाचा आणि राज्याचा विकास हाच निवडणुकीचा मुख्य आधार असून भविष्यातही राहणार आहे. ज्या लोकांना अद्यापही हे कळलं नाही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे,” असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे.

“भाजपा, एनडीएने देश, लोकांच्या विकासाला मुख्य ध्येय ठरवलं आहे. देशहिताची प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आणि प्रत्येक निर्णय घेणार,” असा निर्धार नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. “जर तुम्ही मला बिहारमधील निकालावर विचारलंत तर माझं उत्तरही निकालाप्रमाणे साफ आहे. बिहारमधील यशाचं रहस्य सांगायचं झालं तर हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राचा विजय झाला आहे. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे. तरुण, गरीब जिंकला आहे, शेतकरी जिंकला आहे.. अपेक्षांचा विजय झाला आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

“बिहारला लोकशाहीचं जमीन का म्हटलं जात हे तेथील जनतेने सिद्ध करुन दाखवलं आहे. बिहारमधील जनता जागरुक आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विकासाचा संकल्प सिद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु,” असं सांगत नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे नितीश कुमार मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं.

“मी कालपासून बातम्यांमध्ये सायलेंट व्होटरसंबंधी वाचत आहे. भाजपाला सायलेंट व्होटर मतदान करत आहेत असं सांगितलं जात आहे. वारंवार त्यांचा उल्लेख केला जात आहे. देशातील नारी शक्ती याच आमच्या सायलेंट व्होटर आहेत. ग्रामीण ते शहरापर्यंत महिला मतदार भाजपाचे सायलेंट व्होटर ठरले आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. देशातील तरुणांनी पुढे येऊन भाजपाच्या माध्यमातून देशसेवा करावी असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं.

“जे लोक आमचा सामना करु शकत नाहीत त्यांनी नवा मार्ग अवलंबला आहे. देशात भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु आहे. देशातील काही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. आपले मनसुबे पूर्ण होतील असं त्यांना वाटत आहे. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मला इशारा देण्याची गरज नाही कारण ते काम जनता करेल. निवडणुकीत विजय, पराभव होत असतो पण लोकशाहीत हे चालणार नाही. मृत्यूचा खेळ खेळून मतं मिळणार नाहीत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.