सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण त्यासाठी सज्ज आहोत, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्यावर सध्या मोठं संकट आलं आहे. तरीही आपण खंबीरपणे पुढे जात आहोत. भारत हा विकसनशील देश आहे. आपण एकीकडे गरीबीसारख्या मोठ्या प्रश्नाशीही लढत आहोत. तर दुसरीकडे करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या प्रयत्नांची सर्व राष्ट्रांनी, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे. करोनाशी लढताना आपण सर्व देशांसमोर एक उत्तम उदाहरण दिलं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
आणखी वाचा- “दोन खासदारांचा पक्ष आज ३०० खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”
करोनाविरुद्धच्या लढ्यात भारतानं जे नियोजन केलं आहे, त्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं आहे. या लढ्यात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांना नमन. रविवारी दिवे लावण्याच्या करण्यात आलेल्या आवाहनालाही मोठा प्रतिसाद देत जनतेनं सहभाग घेतला. प्रत्येक नागरिक आज स्वत:ला आणि देशाला वाचवण्यासाठी लढतोय. प्रत्येक भारतीय आज एकत्र, एकसंध आहे. करोनाची लढाई ही मोठी लढाई आहे. यात आपल्याला जिंकायचं आहे. लढून पुढे जायचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
मोदींनी सांगितलेले पाच संकल्प
१. गरिबांच्या राशनसाठी अविरत सेवा अभियान.
२. आपल्यासोबतच घरातल्या इतरांना मास्क द्या.
३. धन्यवाद अभियान राबवा.
४. आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करायला लावा.
५. प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने सहयोगी करावे, ४० लोकांकडून पीएम केअर्स फंडमध्ये दान करण्यास सांगा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 12:21 pm