पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्रानं मोलाची भूमिका साकाली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. सध्या हे क्षेत्र वेगानं पुढे जात आहे. परंतु अजून आपल्याला खुप मोठा पल्ला गाठायचा असल्याचं सांगत करोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमादरम्यान दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

आणखी वाचा- 5 G सेवा ते मोबाइल उत्पादन, समजून घ्या पंतप्रधान मोदींचा भारतीय टेलिकॉम क्षेत्रासंबंधीचा दृष्टीकोन

“आज देशात आणि जगावर मोबाईनं मोठा प्रभाव टाकला आहे. दहा वर्षांपूर्वी त्याचा अंदाज वर्तवणंही कठीण होतं. शेती, आरोग्य विभाग, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये याद्वारे सामान्य लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येऊ शकतो यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे,” असंही मोदी म्हणाले. करोना काळात दूरसंचार क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका पार पाडली. लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला, डॉक्टरांना रुग्णांची मदत करता आली आणि सरकारचं म्हणणंही लोकांपर्यंत पोहोचवता आलं. केंद्र सरकारचं नवं धोरणं दूरसंचार क्षेत्राला पुढे नेणार आहे आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासही मदत करणार असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

आणखी वाचा- India Mobile Congress 2020 : 5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“आज कोट्यवधी लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणं सहजरित्या शक्य झालं आहे. आज ग्रामीण भागांमध्येही डिजिटली अॅक्टिव्ह लोकाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज अब्जाबधींमध्ये कॅशलेश ट्रान्झॅक्शन्स केली जात आहे. आपल्याला आपल्या देशआतील दूरसंचार क्षेत्राला ग्लोबल हब बनवायला हवं,” असंही मोदी यावेळी म्हणाले. आपल्य़ाला आता पुढे जालं लागणार आहे आणि देशात ५ ची स्वप्नही पूर्ण करावं लागणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.