जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा येथे झालेल्या चकमकीत पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मोठा हल्ला घडवण्याचे मनसुबे रचून भारतात आले होते असं म्हटलं आहे. आमच्या सुरक्षादलाच्या जवानांनी त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले असंही मोदींनी म्हटलं आहे.

पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याजवळ मोठ्या संख्येने असलेली शस्त्रास्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. हे सगळे पाहता हे चारही दहशतवादी हे दहशतवाद पसरवण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले आहे तसंच भारतीय लष्कराने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि सतर्कता दाखवत दहशतवाद्यांचा कट उधळून लावला आहे. जम्मू काश्मीरमधील लोकशाही प्रणालीला लक्ष्य करणारा हा कट होता असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली. याबाबत सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार दहशतवादी २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी २६ नोव्हेंबरलाच पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात तयारीत होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना गुरुवारी पहाटे ४ वाजता चकमकीत ठार करत त्यांच्या योजनेला सुरुंग लावला.