खादीची वस्त्रे वापरल्याने देशातील गरीबांना मदत होईल त्यामुळे खादीचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकाशवाणीवरून केले.
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी आकाशवाणीच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केले. विजयादशमीच्या शुभेच्छा देत मोदींनी प्रत्येकाने विजयादशमी दिवशी आपल्यातील दहा अवगुणांचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करण्याची शपथ घ्यावी अशी इच्छाही व्यक्त केली. देशातील शेतकरी, स्त्रिया आणि युवकांमध्ये खरी शक्ती आहे आणि सर्व समस्यांवर मात करण्याची ताकद या त्रिशुळामध्ये आहे असल्याचेही ते म्हणाले.
नागरिकांनी मोदींना पाठविलेल्या ई-मेल मधील काही निवडक मेलचा उल्लेख करून त्यातील सल्ले लक्षवेधून घेणारे असल्याचे मोदी म्हणाले आणि त्यावर नक्की काम करण्यात येईल असा विश्वासही व्यक्त केला. आकाशवाणी म्हणजे देशाच्या कानाकोपऱयात पोहोचण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगत मोदींनी दर रविवारी ११ वा.  आकाशवाणीवरून देशातील नागरिकांशी संवाद साधणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.