भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर शुभेच्छा संदेश देताना ‘भारताशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध आहे’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सांगितले. उभय देशांमधील लोकांचे कल्याण व्हावे, तसेच त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा हेच आमचेही उद्दिष्ट आहे. भारतीयांची भरभराट होवो, तसेच या देशाच्या पंतप्रधानांना उत्तम आयुरारोग्य लाभो, असे शरीफ यांनी भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. भारतीय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पाकिस्तानचे अध्यक्ष मामनून हुसैन यांनीही शुभेच्छा पाठविल्य़ा आहेत. आपल्या संदेशातून त्यांनी परस्पर स्नेह वाढीस लागावा असे म्हटले आहे.