पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन केले. या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून टीका करणाऱ्यांना विरोधकांन घेरले आहे. सेंट्रल व्हिस्टाबाबत गोंधळ पसरवण्याचे काम काही लोकांनी केले आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या मागे आपण काय करत आहोत हे आज देश पाहत आहे. संरक्षण संकुल बांधण्याचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी  २०,००० कोटींच्या प्रकल्पाचे काम करोना काळातही सुरु होतेआहे.

“आम्ही काम करण्याची नवी शैली स्वीकारली आहे. तुम्ही मला २०१४ मध्ये सेवा करण्याची संधी दिली. मी सरकारमध्ये येताच संसद भवन बांधण्याचे काम सुरू करू शकलो असतो. पण आम्ही हा मार्ग निवडला नाही. सर्वप्रथम आम्ही ज्यांनी देशासाठी प्राण दिले त्यांच्यासाठी स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करत आहोत. देशातील कार्यालये निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम आम्ही देशातील शहिदांना आदर देण्याचे काम केले,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची वेबसाईटही सुरू केली. “हे नवीन संरक्षण कार्यालय कॉम्प्लेक्स आपल्या दलांचे कामकाज अधिक सोयीस्कर, अधिक प्रभावी बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळकट करणार आहे. २१व्या शतकात भारताची लष्करी शक्ती बळकट होत आहे. एक एक करून त्यांना आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, देशाच्या सुरक्षेशी संबंधित कामे दशकांपासून जुन्या जागेत व्हावीत हे कसे शक्य आहे?,” असे पंतप्रधानांनी म्हटला आहे.

“आज जेव्हा आपण ‘ईझ ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ वर लक्ष केंद्रित करत आहोत, तेव्हा आधुनिक पायाभूत सुविधांमध्येही तितकीच मोठी भूमिका आहे. सेंट्रल व्हिस्टावर आज जे काम केले जात आहे त्यामध्ये हा आत्मा आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील जुना संरक्षण परिसर इतका जीर्ण झाला आहे की तो कोसळण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले होते. आता ७,००० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी नवीन कॅम्पसमध्ये चांगल्या कामकाजाच्या स्थितीत काम करू शकतील. ही संकुले २१ व्या शतकातील आवश्यकतांनुसार बांधली गेली आहेत आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज आहेत असे राजनाथ सिंह म्हणाले होते.