केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचा दावा; विरोधी पक्षांकडून पुराव्यांची मागणी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या आंदोलनाला लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. राजनाथ यांच्या या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात वादाचे मोहोळ उठले असून विरोधी पक्षांनी यासंदर्भात तातडीने पुरावे सादर करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
अलाहाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजनाथ यांनी जेएनयूतील आंदोलनाला हाफीज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा केला. हाफीज सईदने ट्विटरवरून पाकिस्तानी जनतेला जेएनयूतील आंदोलकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथ यांनी हा दावा केला आहे.
राजनाथ यांनी यावेळी हाफीजसंदर्भात दावा करताच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राजनाथ यांच्याकडे पुराव्यांची मागणी केली. ते म्हणाले, देशाचे गृहमंत्रीच असा गंभीर आरोप करत असतील तर प्रकरण नक्कीच गंभीर आहे. सरकारकडे याप्रकरणी काही पुरावेही असतील, ते त्यांनी देशासमोर सादर करावेत.

विद्यार्थ्यांची चौकशी
शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यापासून परावृत्त करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याचाही समावेश आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद याचा पाठिंबा आहे. देशाने ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.
– राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री.

 

भारतविरोधी कारवाया गंभीर – संघाचा आरोप
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादप्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेस व डाव्या पक्षांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. राष्ट्रविरोधी कृती करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्याऐवजी काही राजकीय नेते त्यांना मान्यता देत असल्याची टीका संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी केली. ते म्हणाले की, देश शिक्षणासाठी करत असलेल्या खर्चातून शिकण्याऐवजी विद्यापीठातील विद्यार्थी भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले असणे व काही शिक्षकांनी त्यांना पाठिंबा देणे, ही गंभीर बाब आहे. डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाचा आरोप सिद्ध झालेल्यांना समर्थन देत देशविरोधी घोषणा देणे, हीदेखील काळजी करण्याजोगी बाब आहे.