नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलन करत असलेल्या विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. त्यातून सतंप्त विद्यार्थ्यांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. यात अग्निशमन दलाचे काही कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीमार केला.

नागरिकत्व कायदा दुरूस्तीनंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यानंतर याविरोधात रोष व्यक्त व्हायला लागला होता. कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. ठिकठिकाणी पोलिसांच्या गोळीबारात पाच जण मरण पावले असून, हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी भारत नगर येथे दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. या आगीनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढविण्यात आला त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जाळपोळीच्या घटनेशी संबंध नसल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच म्हणणं आहे. बसेस जाळणारे बाहेरचे लोक होते, असं विद्यार्थी संघटनाच म्हणणं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची धरपकड केली. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. या पोलीस कारवाईचा विद्यापीठाच्या  कुलगुरू नजमा अख्तर यांनी निषेध केला आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. जमाव खूप हिंसक झाला होता. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.