भारताने थोर सुपुत्र गमावला असून एका पर्वाचा अंत झाला आहे. वाजपेयी यांनी सरकारचे आत्मविश्वासाने नेतृत्व केले. विरोधी पक्षातील ते तर्कपूर्ण टीकाकार होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. - प्रणब मुखर्जी, माजी राष्ट्रपती उल्लेखनीय नेतृत्व आणि कामाप्रती निष्ठा यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. स्वातंत्र्योत्तर काळातील नि:संशय उत्तुंग नेतृत्व होते. लोकशाही बळकट करणे आणि उत्तम कारभार यामधील त्यांचे योगदान विस्मयकारक होते. - व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती वाजपेयींच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीवर विश्वास असलेले नेते होते. देशातील राजकीय क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला आहे. - एच. डी. देवेगौडा, माजी पंतप्रधान अटलजी आमच्या हृदयात आहेत. सदैव राहतील. अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते. तीन वेळा पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठय़ा घटक पक्षांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडीलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता. अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असत. अटलजींच्या सर्वाना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने नैतिक मूल्यांवर अढळ श्रध्दा असणारा, अजातशत्रू लोकनेता गमावला. सुमारे पाच दशकाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने वाजपेयी यांनी दीर्घकाळ संसद गाजवली. मनमिळावू स्वभावामुळे स्वपक्षासोबतच इतर पक्षातही वाजपेयींचे अनेक मित्र होते. देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरारव चव्हाण यांच्याशी अटलबिहारी वाजपेयी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होते. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी शंकरराव चव्हाण यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केल्याचे आजही आपल्या स्मरणात आहे. -अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राजकारणातील अजातशत्रू, सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणारे कविमनाचे सर्वसमावेशक महान नेतृत्व हरपले आहे. वाजपेयी यांना अनुसूचित जाती, जमाती, बहुजनांच्या प्रश्रांबाबत सहानुभूती होती. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कटुताविहिन मैत्रीपूर्ण राजकारणाचा नवा पायंडा त्यांनी पाडला. - रामदास आठवले, केंद्रीय मंत्री स्वातंत्र्यपूर्व असो वा स्वातंत्र्योत्तर भारत ते नवीन सहस्रकातील भारत अशा दीर्घ पटलावर, अर्धशतकाहून अधिक कालावधीची अटलजींची राजकीय कारकीर्द होती. पण एवढय़ा कालावधीत अटलजी कधीच संदर्भहीन झाले नाहीत. उलट, प्रत्येक सरत्या दशकात आणि बदलत्या पिढीत त्यांची गरज जास्तच भासू लागली. आणि म्हणूनच नव्या सहस्रकात प्रवेश करताना देशाचे नेतृत्व अटलजींच्या हाती आले यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही माझ्या पिढीने ऐकली, अनुभवली, त्यांचं सुसंस्कृत राजकारण हे जवळून बघता आले याचा मला खरंच आनंद आहे. भारतीय स्वातंत्र्य पंचाहत्तरीकडे वाटचाल करत असताना खऱ्या अर्थाने शेवटच्या देशव्यापी आणि देशभक्त नेतृत्वाची उणीव नक्कीच भासेल. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन. - राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना