जम्मू- काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत अडथळे आणण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांनी अलीकडे मोठय़ा संख्येने हल्ले केलेले असले, तरी लोकांनी मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदान केल्यामुळे त्यांचे मनसुबे निष्फळ ठरले आहेत, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांचे हल्ले हा मतदानाचे वाढलेले प्रमाण खाली आणण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, परंतु तरीही चांगले मतदान होण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. उदाहरणच घ्यायचे, तर त्राल येथील मतदान १ टक्क्य़ावरून ३७.८ टक्क्य़ांपर्यंत गेले आहे. लोक मतदान करण्यासाठी मोठय़ा संख्येने बाहेर पडत आहेत. राज्यात मतदानाला आणखी दोन दिवस उरले असताना असे आणखी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे संरक्षण खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले.
दहशतवाद्यांनी ५ डिसेंबर रोजी उरी येथील लष्करी छावणीवर केलेल्या भीषण हल्ल्यात ११ सैनिक ठार झाले होते. यासह वाढत्या संख्येतील दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सुरक्षेच्या परिस्थितीची पाहणी करणे हा संरक्षणमंत्र्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काश्मीरमध्ये पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानापैकी शेवटच्या दोन टप्प्यात १४ आणि २० डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २३ डिसेंबरला होईल.
निवडणूक सुरू असेपर्यंत आणखी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याबाबत आम्ही सतर्क आहोत. काश्मीरमधील सैन्यदलाचे मनोधैर्य उच्च दर्जाचे असून ते कुठल्याही ँपरिस्थितीला तोंड देण्यास समर्थ आहेत. उरी आणि नौगाव येथील घुसखोरीच्या घटनांना त्यांनी ज्या समर्थपणे तोंड दिले, त्यावरून हे दिसून आले. या घटनांमध्ये सैनिकांना मरण पत्करावे लागले, मात्र नंतर मात्र त्यांनी दहशतवादी हल्ल्यांची झळ नागरिकांना पोहचू दिली नाही, असे पर्रिकर म्हणाले.