देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. दरम्यान देशात आता दिलादायक वातावरण आहे. कारण करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना विषाणूच्या संसर्गाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये देशात करोनाची दुलरी लाट ओसरत असली तर काही राज्यात १० टक्क्यापेक्षा अधिक पॉझिटीव्हीटी रेट असल्याचे सांगितले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

लव अग्रवाल म्हणाले, “देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत खाली आली आहे. संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील करोनाची सक्रिय प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. मात्र देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांमध्ये करोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. या राज्यांमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे.”

देशातील ७३ जिल्ह्यात करोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे दिसत आहेत. करोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल.”