त्रिपुरा विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पुढच्या दीड वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्रिपुरात सध्या भाजपाची सत्ता आहे. पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचं लक्ष जवळील त्रिपुरा राज्यावर आहे. यासाठी प्रशांत किशोर यांची टीम या राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेत आहे. मात्र त्यांच्या आय-पॅक संस्थेतील २३ जणांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप होत आहे. त्रिपुरातील हॉटेलमधून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आयपॅकचे कर्मचारी अगरतलामधील वुडलँड हॉटेलमध्ये थांबले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कारवाईनंतर त्रिपुरातील तृणमूल काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. लोकशाहीवर हल्ला असल्याची टीका केली आहे. त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आशीष लाल सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “हा लोकशाहीवर हल्ला आहे. मी त्रिपुरात राहणारा आहे. ही त्रिपुराची संस्कृती नाही. त्रिपुरात भाजपाच्या पायाखालची जमीन सरकल्याने अशा पद्धतीने वागत आहे”, असा आरोप आशीष लाल सिंह यांनी केला आहे.

दुसरीकडे कोविड प्रोटोकॉलमुळे त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. करोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना परवानगी देऊ, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

कारगिल युद्धात इस्रायलने कशी केली होती भारताला मदत?; ट्विट करत दिली माहिती

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी तृणमूल काँग्रेसने प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर दिली होती. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. आता तृणमूल काँग्रेसचं २०२४ च्या लोकसभा निवणुकीकडे लक्ष लागून आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor team allegation on tripura police being house arrest rmt
First published on: 26-07-2021 at 21:40 IST