ज्येष्ठ विद्वान आणि अभ्यासक प्रताप भानु मेहता यांनी या आठवड्याच्या सुरूवातीला अशोका विद्यापीठाला आपला राजीनामा सादर केला. हे पद सोडण्यामागील आपले कारण नमूद करताना त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, त्यांचा संस्थेशी असलेल्या संबंधाला संस्थापकांनी “राजकीय जबाबदारी ” असल्याचे स्पष्ट केले आहे. मेहता यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अशोका विद्यापीठावरील संकट गुरुवारी आणखी तीव्र झाले. मेहता यांचे सोडून जाणे शैक्षणिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अस्वस्थ करणारे आहे असे संबोधून त्यांचे सहकारी आणि मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनीही आपला राजीनामा दिला. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये निषेध केला, शिक्षकांनी मेहता यांच्या परतीची मागणी करणारे निवेदन प्रसिद्ध केले आणि आणखी दोन शिक्षक सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे. आशिष धवन आणि प्रमथ राज सिन्हा यांच्यासह अशोकच्या संस्थापकांनी अलीकडेच मेहतांची भेट घेतली आणि सध्याच्या राजकीय वातावरणाचा संदर्भ देवून विद्यापीठ त्यांच्या बौद्धिक हस्तक्षेपांचे यापुढे संरक्षण देऊ शकणार नाहीत अशी सूचना देखील केली असे सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ ला सांगितले. या बैठकीनंतर मेहता यांनी कुलगुरू मलाबिका सरकार यांना आपले राजीनामा पत्र पाठवले त्यात त्यांनी प्रस्थापितांशी झालेल्या संभाषणाबद्दल देखील नमूद केले. राजकारणाबद्दल केलेले माझे लिखाण "स्वातंत्र्याच्या घटनात्मक मूल्यांचा आणि सर्व नागरिकांना समान आदर देण्याचा प्रयत्न करणाऱ् माझ्या राजकारणाच्या समर्थनात केलेले लिखाण विद्यापीठासाठी धोकादायक असल्याचे मानले जाते आहे." त्यांनी पुढे लिहिले, “अशोका सोडण्याची वेळ आता आली आहे हे स्पष्ट झाले आहे. एका उदारमतवादी विद्यापीठाची भरभराट होण्यासाठी उदार राजकीय आणि सामाजिक संदर्भ आवश्यक आहे. मला आशा आहे की ते वातावरण सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठ योग्य भूमिका निभावेल. नीत्शे एकदा म्हणाले होते की “विद्यापीठात सत्यासाठी जगणे शक्य नाही.” मला आशा आहे की भविष्यवाणी खरी ठरणार नाही. ” अशोक येथे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असलेले धवन आणि सहसंस्थापक व बोर्डाचे सदस्य सिन्हा यांनी कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही. तसेच मेहता यांनी काही बोलण्यास नकार दिला