उत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. तुम्हाला ‘बेटी छुपाओ’ संदेश द्यायचा आहे की ‘बेटी बचाओ’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतकं होऊनही सरकार आणि प्रशासन आरोपी आमदाराला अटक का करत नाही. योगीजींना या आमदारावरील आरोप मागे घ्यायचे आहेत, असा आरोप करत या आमदारावर गंभीर गुन्ह्याची नोंद असून तो माजी मंत्री असल्याचे सिब्बल यांनी सांगितले.

आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्याप्रमाणे बलात्कार प्रकरणात भाजपा सरकार अव्वल आहे. ही अत्यंत शरमेची बाब आहे. हरियाणामध्येही बलात्काराच्या घटना वाढल्याचे सांगत त्यांनी आकडेवारीच पत्रकार परिषदेसमोर मांडली.

सिब्बल म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे नोंद झाली आहेत. महाराष्ट्रात ११,३९६ गुन्हे, उत्तर प्रदेशात ११,३३५ तर मध्य प्रदेशमध्ये सुमारे ८ हजार प्रकरणे समोर आली आहेत. बलात्काराच्या प्रकरणात मध्य प्रदेश आघाडीवर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक येतो. या सर्व ठिकाणी भाजपाचेच सरकार असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.