सेवेसाठी ३० हजार कोटींचा प्रस्ताव; काँग्रेसचा खासगी गुंतवणुकीला विरोध

देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली. ‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.

रेल्वे मंत्रालयाने बुधवारी १०९ रेल्वेमार्गावर १५१ रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून लोक केंद्राला माफ करणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

या रेल्वे १६ डब्यांच्या असतील व कमाल १६० किमी वेगाने धावतील. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. रेल्वेचा चालक आणि गार्ड रेल्वे विभागांकडून दिले जातील. मात्र, गाडय़ांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. पात्रता सिद्ध झालेल्या खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी नियुक्त रेल्वेमार्गाची जबाबदारी दिली जाईल. रेल्वेच्या एकूण प्रवासीसेवांमध्ये खासगी प्रवासी सेवांचे प्रमाण फक्त ५ टक्के असेल.

देशभरात १३ हजार रेल्वे धावतात, रेल्वे मंत्रालयाअंतर्गत विविध विभागांमध्ये १२ लाख रेल्वे कर्मचारी काम करतात. देशाचा हा अवाढव्य ‘प्रकल्प’ चालवणे केंद्र सरकारला दिवसे न् दिवस अवघड होत असून दरवर्षी रेल्वेचा तोटा वाढत आहे. त्यामुळे देशतील काही मार्गावरील प्रवासी रेल्वेगाडय़ांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे देण्याचे धोरण राबवण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवलेले आहे.

रेल्वे ही गरिबांची जीवनरेषा असून ती केंद्र सरकार त्यांच्यापासून हिरावून घेत आहे. या धोरणाला लोक तगडे प्रत्युत्तर देतील, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खासगी गुंतवणुकीचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. खासगी गुंतवणुकीतून नवे तंत्रज्ञान मिळेल. जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील. प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल. रोजगारनिर्मिती होईल अशा विविध उद्देशाने खासगी कंपन्यांच्या सहभागाचा निर्णय घेतला आहे.