काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात भारतील लष्कराकडून गेल्या काही वर्षापासून व्यापक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतामध्ये दहशतवादी हल्ला केला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. उरी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. सप्टेंबर २०१६ मध्ये काश्मीरमधल्या उरी येथील मुख्यालयावर पहाटेच्या सुमारास चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात १९ भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने काश्मीरमध्ये ऑलआऊट अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली होती. यामध्ये लष्कर ए तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांच्या अनेक कमांडरना कंठस्नान घालण्यात आले होते. तसेच शोधमोहिमा राबवून इतरही अनेक लहान मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. २०१८ मध्ये लष्कराने तब्बल ३११ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकवेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत दहशतवादी हल्ले हाणून पाडले होते. (आणखी वाचा : Pulwama Terrorist Attack: काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १८ जवान शहीद) उरी हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कडक कारवाई सुरू केली. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांची ठिकाणे उद्धवस्थ केली होती. २०१६ मध्ये झालेला उरी आणि आताचा जम्मू काश्मीरमध्ये झालेला हल्ला जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता.