जम्मू- काश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला असून ही वेळ राजकारणाची नाही. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष अशा प्रसंगी केंद्र सरकारसोबत आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

पुलवामा येथे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने घडवलेल्या आत्मघाती स्फोटात ३९ जवान शहीद झाले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली.  दहशतवादाद्वारे देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न केले जातात. कोणतीही शक्ती या देशाचे तुकडे नाही करु शकत, असे राहुल गांधींनी सुनावले. अशा प्रसंगी काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष देश आणि सरकारच्या पाठिशी उभे आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. या हल्ल्यामुळे मी खूप दु:खी झालो आहे. मी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना इतकंच सांगतो की आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी नमूद केले.

देशाचे तुकडे करणे हेच दहशतवादाचे उद्दीष्ट असते. सुरक्षा दलांविरोधात हिंसेचा वापर निंदनियच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. देशाचे नुकसान करण्यात यशस्वी झालो हे त्या हल्लेखोरांना वाटायला नको. अशा गोष्टींना देश कधी विसरत नाही, हे त्या लोकांना समजलेच पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा आहे. आम्ही या देशाला एकत्र ठेवण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.