पुलवामा येथे झालेल्या भ्याड आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असताना एनडीटीव्हीच्या एका महिला पत्रकाराने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. या महिला पत्रकाराने व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवणारी संतापजनक पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार समोर येताच एनडीटीव्हीने याची गंभीर दखल घेत संबंधित महिला पत्रकारावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. दोन आठवड्यांसाठी एनडीटीव्हीने त्या महिला पत्रकाराचं निलंबन केलं आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र या हल्ल्याचा निषेध होत असाताना एनडीटीव्हीच्या वरिष्ठ महिला संपादक निधी सेठी यांनी आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून शहीद जवानांची खिल्ली उडवली. ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले’ अशा आशयाचं ट्विट करत सेठी यांनी #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून #HowsTheJaish या हॅशटॅगकडे पाहिलं जातं.

त्यांची पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला चांगलंच धारेवर धरलं. नेटकऱ्यांनी निधी सेठी यांना त्यांच्या वादग्रस्त पोस्टचा जाब विचारत चांगलेच झापले. मोठ्या प्रमाणात निधी सेठी यांना ट्रोल करण्यात आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एनडीटीव्हीने तात्काळ कारवाई करत निधी सेठी यांना दोन आठवड्यांसाठी निलंबित केलं. तसंच सेठी यांनी केलेल्या पोस्टवर एनडीटीव्हीने निषेध देखील नोंदवला आणि सध्या दोन आठवड्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे. अनुशासन समिती पुढील कारवाई कऱण्याबाबत निर्णय घेईल असंही स्पष्ट केलं आहे.