विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले. मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाने आता या प्रकरणामध्ये काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा सर्व प्रकार काँग्रेसचा डाव असल्याचे म्हटलं आहे. पंजाबमध्ये सध्या जे काही होत आहे ते राहुल गांधीच्या इशाऱ्यावर केलं जात आहे. घडलेली घटना ही लज्जास्पद असली तरी अनेपेक्षित नव्हती, असा टोलाही नड्डा यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन पंजाबमध्ये जे काही झालं ते निंदनिय असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांबद्दलचा पंजाबमधील शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत आहे. घडलेली घटना म्हणजे याच असंतोषाचे उदहारण असून हे देशासाठी चांगले नाही. पंतप्रधानांनी या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना मदत केली पाहिजे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. रविवारी पंजाबमधील काही लोकांनी रावणाच्या पुतळ्यावर मोदींचा मुखवटा लावून त्याचं दहन केल्याने यावरुन आता राजकारण चांगलच तापल्याचं चित्र दिसत आहे. काही ठिकाणी मोदींबरोबरच रावणाची दहा तोंड म्हणून भाजपाचे काही नेते आणि कॉर्परेट क्षेत्रातील बड्या व्यक्तींचे चेहरे लावण्यात आले होते.

पंजाबमधील या घटनेची माहिती समोर आल्यानंतर भाजपा विरुद्ध काँग्रेस असं आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झालं आहे. नड्डा यांनी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्याचा लज्जास्पद प्रकार हा राहुल गांधीच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यांच्याकडून अशाच गोष्टीची आपल्याला अपेक्षा असल्याचा टोलाही नड्डा यांनी लगावला. नेहरु आणि गांधी कुटुंबाने देशाच्या पंतप्रधान पदाचा कधीच मान ठेवला नाही. २००४ ते २०१४ च्या कालावधीमध्ये असेच चित्र पाहायाला मिळालं. या कालावधीमध्ये पंतप्रधान पद अधिक अधिक दुबळं करण्यात आलं, असंही नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अनेक आठवड्यांपासून पंजाबमध्ये आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी मोदींचा मुखवटा लावून रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने या विरोधामध्ये राजकीय वादाची आणखीन एक ठिणगी पडली.