जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने MeToo या मोहिमेबद्दल बोलताना आपल्या देशात महिलांचा आदर करण्याचं प्रमाण कमीच असल्याची खंत बोलून दाखवली आहे. आपल्या देशात महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे तो बदलण्याची गरज आहे असंही सिंधूने बोलून दाखवलं आहे. आपल्या देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये महिलांचा आदर मोठ्या प्रमाणावर केला जातो असंही सिंधूने म्हटलं आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सिंधूची हजेरी होती तिथेच तिने हे वक्तव्य केले आहे.

मी जेव्हा देशाबाहेर खेळायला जाते तेव्हा त्या देशांमध्ये मला महिलांबाबतचा आदर पाहण्यास मिळतो, अनुभवता येतो. भारतात अनेकजण म्हणतात की महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्याबाबत आदर राखला पाहिजे पण प्रत्यक्षात ही कृती अत्यंत कमी प्रमाणात घडते ही बाब दुर्दैवी आहे अशीही खंत सिंधूने बोलून दाखवली.

महिलांनी अबला नाही तर सबला झालं पाहिजे. स्वतःवरचा विश्वास महिलांनी कधीही ढळू देऊ नये. महिलांवर अन्याय झाला, त्यांचं शोषण झालं तर त्यांनी त्यावर बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. कोणीही तुम्हाला मागास समजणार नाही उलट आवाज उठवलात तर लोक मदतच करतील असंही मत सिंधूने व्यक्त केलं. या कार्यक्रमात सिंधूला MeToo मोहिमेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता ज्यावर तिनं हे उत्तर दिलं.