शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Quacquarelli Symonds (QS) या कंपनीने जगातील विद्यापीठांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील आयआयटी आणि आयआयएस या संस्था उत्कृष्ट विद्यापीठ ठरल्या आहेत. पहिल्या २०० विद्यापीठांच्या यादीत आयआयटी मुंबई १६२व्या स्थानावर, आयआयएस बंगळूरू (१७०) तर आयआयटी दिल्ली १७२व्या स्थानावर आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीवर मात केली असून ही संस्था देशातील सर्वोत्कृष्ट संस्था ठरली आहे. बुधवारी रात्री हे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करण्यात आले.

आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीला पिछाडीवर सोडत १७ व्या स्थानाने वर उडी घेतल्याने ती देशातील सर्वात अव्वल रँकची शैक्षणिक संस्था ठरली आहे. तर दुसरीकडे आयआयएस बंगळूरू या संस्थेनेही आयआयटी दिल्लीला मागे टाकले आहे. मात्र, असे असले तरी टॉप १५० मध्ये या संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही.

दरम्यान, यंदा आयआयटी दिल्लीने आपला क्रमांक कायम राखला आहे. मात्र, आयआयटी मुंबईने आपल्या रँकचा चढता क्रमांकाचा आलेख कायम राखला आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईने ४०व्या क्रमांकाने वर उडी घेतली होती. २०१६ मध्ये त्याची रँक २१९ होती. त्यानतंर ती १७९ होती त्यानंतर आता १६२ व्या क्रमांकावर आयआयटी मुंबईने उडी घेतली आहे. याचा अर्थ भारतातील या उच्च तंत्र शिक्षण संस्थेने सातत्याने आपली कामगिरी उंचावली आहे.

दरम्यान, आयआयएस बंगळूरू ही फॅकल्टीनुसार, जगातील दुसऱ्या क्रमांकाची संशोधन संस्था ठरली आहे. तसेच आयआयटी रुरकी या संस्थेला १०० पैकी ८९.५ इतके गुण देण्यात आले आहेत. तसेच आआयटी दिल्ली (८४/१००), आयआयटी खरगपूर (७६.८/१००) आणि आयआयटी कानपूर (७५.६/१००) असे गुण देण्यात आले आहेत.