बिहारला बिमारू राज्य म्हणून हिणवणाऱ्यांना जनतेने मतपेटीच्या माध्यमातून उत्तर दिले असल्याचे बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांची पत्नी राबडीदेवी यांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, जदयू, राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीने स्पष्ट बहुमत मिळण्यासाठी आवश्यक जागांवर आघाडी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, लालूप्रसाद यादव यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे बिहारमध्ये नितीशकुमारच पुन्हा मुख्यमंत्री बनतील. बिहारमधील जनतेला रोजगार मिळवून देण्यात तसेच त्यांना वीज आणि पाणी देण्यासाठी आम्ही वेगाने प्रयत्न करू. निवडणुकीचे निकाल बघून खूप छान वाटते आहे. आम्ही गेले काही महिने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. बिहारमध्ये येऊन सातत्याने बिमारू राज्य म्हणून आम्हाला हिणवणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे.