मोदी सरकारला सातत्यानं लक्ष्य करत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या भाजपाबद्दलच्या भूमिकेवरून वादंग निर्माण झालं होतं. त्यापाठोपाठ आता व्हॉट्सअॅपवरून राहुल गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना राहुल गांधी यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकाचा हवाला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुक इंडियाच्या भाजपाबद्दलच्या भूमिकेवर शंका उपस्थित करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. यावरून मोठं वादंगही निर्माण झालं होतं. मात्र, फेसबुक त्याबद्दल भूमिका स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

आणखी वाचा- सरकारच्या ‘या’ तीन निर्णयांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त; राहुल गांधींचा अर्थमंत्र्यांवरही निशाणा

त्या वादानंतर आता राहुल गांधी यांनी टाइम मासिकातील वृत्तांचा हवाला देत मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ४० कोटी भारतीयांकडून वापरलं जाणाऱ्या व्हॉट्सअॅपवर भाजपाची पकड आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी टाइममधील लेख ट्विट करत म्हटलं आहे की,”अमेरिकेच्या टाइम मासिकानं व्हॉट्सअॅप आणि भाजपातील संबंधाचा पर्दाफाश केला आहे. ४० कोटी भारतीय वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी वापर करण्याची व्हॉट्सअॅपची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना मोदी सरकारची परवानगी आवश्यक आहे. अशा प्रकारे व्हॉट्सअॅपवर भाजपाची पकड आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आणखी वाचा- तुम्ही ‘मेसेंजर ऑफ गॉड’ आहात, मग उत्तर द्या…; चिदंबरम यांचा सीतारामन यांना सवाल

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप मालकी असलेल्या फेसबुकवरही असाच आरोप झाला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुकच्या भाजपावर कारवाई न करण्याबद्दलच्या भूमिकेचा गौप्यस्फोट केला होता. फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ कार्यकारिणीनं सत्ताधारी भाजपाशी संबंधित चार नेते आणि ग्रुप यांच्यावर द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट संदर्भात असलेले नियम लागू करण्यास विरोध केल्याचं या वृत्तात म्हटलं गेलं होतं. रिपोर्टनुसार फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी संचालक अंखी दास यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. “भाजपा नेत्यांवर हिंसाचार पसरवणाऱ्या पोस्टवरून कारवाई केल्यास कंपनीच्या भारतातील व्यावसायिक वाढीला धोका निर्माण होऊ शकतो,” असं दास यांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.