शेतकरी आणि कामगार यांनी उद्ध्वस्त करणं हेच मोदी सरकारचं धोरण आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. सध्याच्या घडीला आणण्यात आलेले कृषी कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. तर जीएसटी आणि नोटाबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलं आहे अशीही टीका राहुल गांधी यांनी केली. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.देशातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मोदी सरकारने नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे आमची सत्ता आल्यास रद्द करु असं आश्वासन राहुल गांधी यांनी रविवारीच पंजाबमध्ये दिलं होतं. त्या पाठोपाठ आता आज त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

मागील सहा वर्षांमध्ये शेतकरी, गरीब जनता, मजूर वर्ग यांच्यावर मोदी सरकारकडून एकापाठोपाठ एक आक्रमणं केली जात आहेत. गरीब जनतेसाठी ठोस पावलं उचलावती ही यांची निती नाही. मोदींना फक्त त्यांच्या तीन ते चार मित्रांचं भलं करायचं आहे. पंजाबच्या संगरुरया ठिकाणी झालेल्या रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

आणखी वाचा- राहुल गांधींना काही काम नाहीये, त्यामुळे… ; भाजपा मुख्यमंत्र्यांची टीका

सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मूठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकार ती संपवू पाहत आहे मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.