अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांवर भाष्य करत सरकारला धारेवर धरलं होतं. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी घणाघाती हल्ला केला. अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख Doomsday man of India असा उल्लेख करत राजस्थान, मध्य प्रदेशातील कर्जमाफीचा मुद्दा, तसेच पंजाबमधील कायद्यावरून सवाल उपस्थित केला. “राहुल गांधी खोट्या कथा सांगत आहेत, ज्यामुळे भारताचा अपमानच होत आहे,” अशी टीकाही सीतारामन यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. सीतारामन म्हणाल्या,”राहुल गांधी यांचं भाषण फक्त शेतकरी आंदोलनावर होतं, अर्थसंकल्पावर नव्हतं. शेतकऱ्यांचा मुद्दाही अर्थसंकल्पाचा भाग असून, आपण त्यावरच बोलू असं ते म्हणाले होते. त्यावर मी उत्तर देत आहे,” असं सीतारामन यांनी सांगितलं.

आणखी वाचा- मुलगी आणि जावयाची काळजी आम्ही करायची; ‘हम दो, हमारे दो’ला अर्थमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

“काँग्रेस निवडणूक जाहीरनाम्यात कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच वचन दिलं होतं. त्यावरून काँग्रेसनं यू-टर्न का घेतला हे राहुल गांधी सांगतील अशी मला अपेक्षा होती. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि राजस्थानात सरकार आल्यानंतर कर्जमाफी करण्याची घोषणा काँग्रेसनं केली होती. मध्य प्रदेशात सत्तेत असताना काँग्रेसनं कर्जमाफी का केली नाही. राजस्थानात काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेस का कर्जमाफी करत नाही,” सवाल अर्थमंत्र्यांनी केला.

आणखी वाचा- राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

“राहुल गांधी पंजाबमधील काळ्या कायद्याविषयीही बोलतील असं मला वाटलं होतं. ज्या कायद्यात शेतकऱ्यांना तुरूंगात टाकण्याची तरतूद आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना तो कायदा रद्द करायला लावू, असं ते सांगतील. अशी अपेक्षा मला होती. पण ते काहीच बोलले नाही. तीन कृषी कायद्यांमधील एक तरतूद जी शेतकरीविरोधी आहे. त्यावर बोलतील असं वाटलं होतं. राहुल गांधी नेहमी पंतप्रधानांचा अवमान करतात. मग ते सध्याचे असो की माजी. जेव्हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग परदेशात होते, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या अध्याधेशाची प्रत फाडून फेकली होती,” अशी टीका सीतारामन यांनी केली.

“सीमेवर काही समस्या उद्भवली, तर सरकारसोबत चर्चा न करता दूतावासासोबत संवाद साधतात. कधीही देशावर विश्वास न दाखवता बाहेरच्या लोकांवर विश्वास टाकतात. तुकडे तुकडे गॅंगसोबत हातमिळवणी करतात. संविधानाप्रमाणे निवडण्यात आलेल्या लोकांबद्दल चुकीचे शब्द वापरतात आणि पुन्हा माफी मागतात. मला असं वाटतंय की ते Doomsday man Of India बनत चालले आहेत,” असं टीकास्त्र सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर डागलं.