देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड वेगानं होणार रुग्णवाढ आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली मृत्यूंची संख्या काळजीत भर टाकू लागली आहे. संक्रमणाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी विविध राज्यांकडून उपाययोजना केल्या जात असून, केंद्रानंही लसीकरणाला वेग देण्यासाठी परदेशी लसींच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, केंद्राच्या लसीकरण रणनीतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विट केलं असून, केंद्र सरकारची लसीकरणासंदर्भातील रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही, असं टीकास्त्र डागलं आहे. “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा”; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या

आणखी वाचा- करोना लसीकरणावरुन केरळ आणि केंद्र सरकार आमने-सामने; विजयन यांचं मोदींना पत्र

लसीकरण धोरणात भेदभाव

यापूर्वी बोलतानाही राहुल गांधींनी लसीकरण धोरणावरून केंद्राला लक्ष्य केलं होतं. “केंद्र सरकारचे लस धोरण भेदाभेद करणारे असून धोरणामध्ये दुर्बल घटकांसाठी लशीची हमी देण्यात आलेली नाही. दुर्बल घटकांना लशीची हमी नाही, केंद्र सरकारची भेदाभेद करणारी रणनीती आहे, वितरणाची रणनीती नाही,” अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्राला सुनावलं होतं. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे खापर जनतेवर फोडणारे सरकार सहकार्याची भूमिका घेणार आहे का,” असा सवालही त्यांनी केला होता.