छत्तीसगडच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शनिवारी सरगुजा येथे एका रॅलीमध्ये मोदींनी राफेल करारावर केवळ १५ मिनिटे माझ्याशी खुली चर्चा करावी असं थेट आव्हान दिलं. मोदींनी कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी माझ्याशी केवळ १५ मिनिट राफेलवर चर्चा करावी. त्यांनी १५ मिनिटं मला राफेलवर बोलू द्यावं आणि त्यानंतर तेवढ्याच वेळ स्वतः त्यावर बोलावं असं राहुल गांधी म्हणाले. राफेल कराराद्वारे मोदींनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला ३० हजार कोटी रुपये दिले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


छत्तीसगडधील विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी शनिवारी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी नोटाबंदी, कर्ज बुडवणारे उद्योजक यांच्यावरुन मोदी सरकारला फटकारले. मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करुन सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या. पण श्रीमंत उद्योजकांना त्यांनी दिलासा दिला. मोदींनी श्रीमंत उद्योजकांचे ३. ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले.पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असे त्यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येताच १० दिवसांच्या आत आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु, असे राहुल गांधींनी जाहीर केले. कर्जमाफीसाठी पैसे कुठून आणणार, याचे उत्तरही त्यांनी दिले. ‘मोदीजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी अशा लोकांकडून आम्ही पैसे वसूल करु आणि गरीब शेतकऱ्यांचे कर्जमाफ करु, असे त्यांनी सांगितले.

देशातील गरीब जनतेने चोरी केली नव्हती. मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून पैशांची चोरी केली. नोटाबंदीद्वारे त्यांनी गरीबांना बँकेसमोर रांगेत उभे केले. तुम्ही सूटबूटवाल्या लोकांना बँकेसमोर रांगेत पाहिले का?, असा सवाल त्यांनी विचारला.