म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे फक्त भारतामध्येच करोनासोबतच आता ब्लॅक फंगसची नवी महामारी उद्याला आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील.

करोना परिस्थितीवरून विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. विरोधकांनी मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. भारतात गेल्या काही दिवसांत करोनाच्या रोजच्या घटनेत घट झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या कमी होत नाही. दुसरीकडे, देशातील बऱ्याच राज्यांत लशीच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले होते, “देशात लसीकरण कमी होत आहे आणि करोनामुळे मृत्यू वाढत आहेत. लक्ष भटकवणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हीच केंद्र सरकारची निती आहे.”

आणखी वाचा- “आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा…”,रोहित पवारांचा केंद्र सरकारला आर्थिक नियोजनाचा सल्ला!

राहुल गांधींचे टीकासत्र सुरुच आहे. चार दिवसांपूर्वी देखील त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. तसेच या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुलांना करोनापासून वाचविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्व तयारी अगोदरच पूर्ण करावी लागेल, असे म्हणत कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
तसेच टूलकिट प्रकरणावरुन देखील कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या काँग्रेसच्या कथित टूलकिटचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच तापू लागला आहे. काँग्रेसकडून यासंदर्भात राष्ट्रीय, तसेच राज्यातल्या नेत्यांकडून देखील खुलासे आणि प्रत्युत्तर देण्यात आलं.