भाजपमध्ये सध्या सुरू असलेला अंतर्गत कलह आणि गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी उपस्थित केलेला हिंदू दहशतवादाचा मुद्दा या पार्श्वभूमीवरही सध्याच्या घडिला जर देशात निवडणुका झाल्या तर भाजपप्रणित सरकार सत्तेवर येईल असा निष्कर्ष एबीपी-नेल्सन यांनी केलेल्या एक्झिट चाचणीवरून  काढण्यात आला आहे.   
देशातील एकूण २८ शहरांमध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र, राहुल गांधी यांना कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पद बहाल होणे आणि नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागणे व राजनाथ सिंह भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होणे या देशाच्या राजकीय पटलावरील दोन प्रमुख घटनांच्या आधी ही चाचणी घेण्यात आली होती.  
जेव्हा निवडणुकीत कोणत्या पक्षाला मतदान करणार हा मुख्य प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ३६ टक्के लोकांनी त्याचे उत्तर भाजप असे दिले तप कॉंग्रेसला केवळ १८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.  
तसेच केंद्र सरकारमध्ये सर्वोच्च पदी कोणता नेता योग्य वाटतो असा प्रश्न विचारला असता, त्यावर ४८ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदान केले. राहूल गांधी यांना १८ टक्के तर मनमोहन सिंग यांना केवळ ७ टक्के मते मिळाली.
याचाच अर्थ यूपीए सरकार आपल्या सरकारची सर्व ध्य़य-धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
या चाचणीनुसार ३९ टक्के जनतेला एनडीएचे सरकार केंद्रात यावे असे वाटते तर फक्त २२ टक्के जनती ही यूपीएच्या बाजूने आहे.