उत्तर प्रदेश आणि बिहारमधील जनतेबद्दल दोन वर्षांपूर्वीच्या निवडणूक मेळाव्यात बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे. शहरस्थित वकिलाने केलेल्या याचिकेवरून हे समन्स बजाविण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे १४ नोव्हेंबर २०११ रोजी निवडणूक प्रचाराचा नारळ राहुल गांधी यांनी फोडला. त्या वेळी झालेल्या सभेत त्यांनी जनतेला उद्देशून, तुम्ही अजून किती दिवस, पंजाब आणि दिल्लीत जाऊन मजूर म्हणून काम करणार, किती दिवस महाराष्ट्रात जाऊन कामाची भीक मागणार, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांचे वक्तव्य हे स्पष्टपणे बदनामीकारक आहे आणि त्यामुळे कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, असे अर्जदाराने म्हटले आहे. न्यायदंडाधिकारी जसविंदर सिंग यांनी राहुल गांधी यांच्यावर समन्स बजाविले असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी १९ सप्टेंबरची मुदत दिली आहे.