करोना रुग्णांची वाढती संख्या व लागू करण्यात आलेला लॉकडाउन या मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका करत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी लॉकडाउन अपयशी ठरल्याचा मुद्दा पटवून देण्यासाठी आकडेवारी व आलेखही शेअर करीत आहे. सोमवारी राहुल गांधी यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्याचबरोबर अल्बर्ट आईन्स्टाईन यांच वाक्य शेअर करत “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं”, अशी टीका राहुल गाधींनी केली आहे.

केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी भूमिका मांडत आहेत. लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यापासून हा लॉकडाउन अपयशी ठरल्याची टीका राहुल गांधी करीत आहे. यासंदर्भात त्यांनी आलेख आणि आकडेवारीची माहिती देऊन सरकारवर निशाणाही साधला. दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि देशातील करोनामुळे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येबद्दलचा आलेख ट्विट केला आहे. त्याचबरोबर त्यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं एक वाक्यही ट्विट केलं आहे. “अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार,” असं अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं वाक्य असून, त्यानंतर “हे या लॉकडाउननं सिद्ध केलं आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

आणखी वाचा- “…अन् नितीशकुमारांना वाटत लोकांनी घराबाहेर पडून निवडणुकीत सहभागी होण्यात कसलाही धोका नाही”

दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी लॉकडाउनवरून मोदींवर टीका केली होती. “वेडेपणा इतका की, तिच तिच गोष्ट सारखी करतायेत आणि वेगळ्या निकालाची अपेक्षा ठेवतात -अज्ञात” असं वाक्य पोस्ट करत राहुल गांधी यांनी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर निशाणा साधला होता. लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अर्थव्यवहार ठप्प झाल्यानं अनेक उद्योगांना याची झळ बसली आहे.