देश सध्या करोनाच्या संकटात आहे. या सर्वांत मोठ्या मानवी संकटातून बाहेर पडण्यासाठी देशातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, अशा आशयाचं पत्र काँग्रेस खासदार राहुल गाधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, या स्थितीत सरकार करत असलेल्या उपाययोजनांना आमचं पूर्णपणे सहकार्य आहे. सध्या तीन आठवड्याचं लॉकडाउन देशात आहे आणि मला शंका आहे की तो आणखी वाढवला जाऊ शकतो. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून काही गोष्टीही सुचवल्या आहेत. भारतात इतर देशांपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा सरकारनं वेगळी पावलं उचलायला हवीत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या संकटसमयी आम्ही सरकारच्यासोबत आहोत. सरकारसोबत राहून आम्ही या आव्हानाचा सामना करु, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. Congress MP Rahul Gandhi writes to Prime Minister Narendra Modi offering suggestions on #COVID19. Gandhi says 'we stand together with the government in fighting and overcoming this tremendous challenge' pic.twitter.com/nIUz2koIzy — ANI (@ANI) March 29, 2020 राहुल गांधी म्हणतात, देशात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याऐवजी गरिबांच्या हिताची काही पावलं उचलायला हवीत. कारण, लॉकडाऊननंतरच देशातील सर्वच भागातील गरिबांच्या अडचणीत वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. शनिवारी संध्याकाळी तर दिल्लीतील आनंद विहार येथे आपल्या घरी परतणाऱ्या मजूर-कामगार लोकांची गर्दी उसळली होती. यापूर्वी दिल्ली-गाजियाबाद सीमेवर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. जे आपल्या घरी पायीच निघाले होते. आपल्या देशात गरिबांची संख्या मोठी आहे. जे रोजच्या कमाईवर अवलंबून असतात. संपूर्णपणे लॉकडाऊन केल्यामुळे या आजाराचा आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढेल. आपली प्राथमिकता ही असायला हवी की आपण वृद्ध आणि अशा लोकांना आधी आयसोलेट करायलं हवं जे लवकर करोना विषाणूच्या भक्षस्थानी येऊ शकतात. तसेच तरुणांना एकमेकांजवळ आल्यामुळे होणाऱ्या संकटाबाबत समजवावे.