गेल्या काही दिवसांपासून कृषि क्षेत्राशी निगडित असलेल्या तीन विधेयकांपैकी दोन विधेयके आज प्रचंड गदारोळात राज्यसभेत मंजूर झाली. या विधेयकांना काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र विरोध केला. सभागृहात गदारोळ सुरू असतानाच आवाजी मतदानानं विधेयक मंजूर झाली आहेत. या विधेयकांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारकडून मांडण्यात आलेल्या कृषि विषयक विधेयकावर राज्यसभेत प्रचंड गदारोळ सुरू असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला. राहुल गांधी यांनी दोन प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना गुलाम बनवलं जात असल्याची टीका केली.

“मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही? मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

“शेतकरी आत्महत्या करणार नाही, ग्वाही सरकार देणार का?”

काँग्रेसबरोबर शिवसेनेनंही मोदी सरकारकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात बोलताना सरकारला सुनावलं.”देशातील ७० टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?, त्यानंतर यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही,” याची ग्वाही सरकार देणार का? या विधेयकांना शेतकऱ्यांचा विरोध आहे. तर पूर्ण देशात याला विरोध का होत नाहीये? जर देशभरात विरोध होत नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो की, विधेयकासंदर्भात काही गैरसमजही आहेत. सरकारनं हे गैरसमज दूर करायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का?,” असा टोला राऊत यांनी लगावला.