कलंकित लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱया केंद्र सरकारचा वादग्रस्त वटहुकूम फाडून फेकून देण्याचे विधान करून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचाच नाही तर संपूर्ण देशाचा अपमान केल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशात अराजकाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
ते म्हणाले, डॉ. सिंग हे कॉंग्रेस पक्षाचे सभासद आहेत. सोनिया गांधी या त्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत आणि राहुल गांधी उपाध्यक्ष आहेत. पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱयावर असताना आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांची भेट नियोजित असताना राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संबंध देशाला शरमेने मान खाली घालावी लागलीये. पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत असतात. ज्यावेळी ते बाहेरच्या देशात दौऱयावर असतात, त्यावेळी ते देशाचे प्रतिनिधित्व करीत असतात. विरोधी पक्षही पंतप्रधान परदेश दौऱयावर असताना कोणतीही जहाल वक्तव्य करण्याचे टाळतात, याकडेही राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.