सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवाण खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. "आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली?," असा सवाल राहुल गांधी मोदींकडे उपस्थित केला आहे. गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आणखी वाचा- मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, संख्या वाढण्याची भीती राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. "पंतप्रधान का शांत आहेत?, ते का लपवत आहेत? आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली?," असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. आणखी वाचा- बदला घ्या, बलिदान वाया जाता कामा नये – असदुद्दिन ओवेसी Why is the PM silent? Why is he hiding? Enough is enough. We need to know what has happened. How dare China kill our soldiers? How dare they take our land? — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2020 आणखी वाचा- “लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत” अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे १९७५ मध्ये चीनच्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुमारे साडेचार दशकांनंतर भारत-चीन सैन्याच्या संघर्षांत ही जीवितहानी झाली आहे. दोन्ही बाजूंकडील सैन्य संघर्षपूर्व स्थितीला नेण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. यामुळे तणाव कमी होत असतानाच ही घटना घडली. याबाबत दोन्ही लष्करांकडून चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी परिस्थिती स्फोटक बनत चालल्याची चिन्हे अस्वस्थ करणारी ठरत आहेत.