चीनसह भारतातून फरार झाल्या उद्योगपतींच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात नवा नारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओतून राहुल गांधी यांनी देशवासीयांना काँग्रेसच्या नव्या अभियानाशी जोडण्याचं आवाहनही केलं आहे.

युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्तानं राहुल गांधी यांनी अभियानाची घोषणा करणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. राहुल गांधी म्हणाले,”जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशातील तरुणांना आश्वासन दिलं होतं की, प्रत्येक वर्षी २ कोटी लोकांना रोजगार देणार. खूप मोठं स्वप्न दाखवलं होतं. पण, सत्य हे आहे की, १४ कोटी लोकांना मोदीजींच्या धोरणामुळे बेरोजगार बनवलं आहे. हे सगळं चुकीच्या धोरणांमुळे झालं आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाउन. या तीन गोष्टींनी भारताच्या आर्थिक पायालाच संपवलं आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आता सत्य हे आहे की भारत देशातील तरुणांना नोकरी देऊ शकत नाही. त्यामुळे युवक काँग्रेसनं रस्त्यावर आली आहे. मला आनंद होत की, युवक काँग्रेस प्रत्येक तालुक्यातील रस्त्यावर उतरून हा मुद्दा उचलून धरणार आणि पूर्ण ताकदीनं हा मुद्दा लावून धरणार आहे. ‘रोजगार द्या’ अभियानात देशवासीयांनी सहभागी व्हावं आणि युवक काँग्रेससोबत मिळून देशातील तरूणांना रोजगार मिळवून द्यावा. मी युथ काँग्रेसचं अभिनंदन करू इच्छितो. आज युवक काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. सक्रिय राहा, देशातील तरुणांसाठी लढा द्या,” असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

९ ऑगस्ट १९६० रोजी युवक काँग्रेसची स्थापना झाली होती. आज युवक काँग्रेसचा ६० वा वर्धापनदिन असून, या निमित्तानं काँग्रेसनं रोजगार दो अभियानाची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही हा हॅशटॅगसह ट्विट केलं आहेत. राहुल गांधीशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही व्हिडीओ ट्विट केले आहेत.