पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राफेल कराराचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भातली एक कविताच राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. मोदी अंबानी का देखो खेल, HAL से छीन लिया राफेल अशी या कवितेची सुरूवात आहे. तसेच नंतर जनतेला आवाहन केले आहे की आपण सगळे मिळून लुटारूंची कंपनी थांबवू.

फ्रान्ससोबत झालेला राफेल विमानांचा करार म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा आहे असा ट्विट काँग्रेसने केला आहे. या सिनेमात मैत्री, पटकथेतले नाटकी प्रसंग, रहस्य, विश्वासघात आहे. राफेल करारासंबंधीच्या ब्लॉकबस्टरमध्ये लष्कराच्या सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती पणाला लावण्यात आली आहे. मोदी आणि अंबानींचा हा सिनेमा एकदम ब्लॉकबस्टर ठरल्याचीही टीका या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आलं आहे. ही टीका ताजी असतानाच पुन्हा एकदा एक कविता ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा होण्यासाठी फेरबदल केले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर, चोरांचे सरदार आहेत अशीही टीका त्यांनी केली. राफेल करारातील विमानांची किंमत यूपीएच्या काळात होती त्यापेक्षा कैकपटीने वाढली आहे असाही आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देणारे व्हिडीओ आणि सोशल पोस्ट भाजपानेही पोस्ट केल्या. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना मर्यादा सोडल्याचीही टीका भाजपाने केली. तरीही काँग्रेसने राफेल करारावरून टीका करणे सोडलेले नाही.