राहुल गांधी प्रचारात अपयशी ठरल्यामुळेच कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना रायबरेली आणि अमेठीमध्ये प्रचारात उतरविल्याची टीका भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी बुधवारी केली.
उमा भारती झांशीमधून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या म्हणाल्या, प्रचारसभांमधील प्रियांका गांधींची भाषणे राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत. यातूनच हे सिद्ध होते की राहुल गांधी साफ अपयशी ठरले आहेत. त्यामुळे थोड्याफार जागा तरी मिळवता याव्यात, यासाठीच कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांना प्रचारात उतरविले आहे.
प्रियांका गांधी गेल्या काही दिवसांपासून रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात प्रचारसभा घेत असून, त्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताहेत. त्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी आपल्या विरोधी पक्षावर टीका केली आहे.