बेंगळुरूमध्ये जमावाने टांझानियाच्या तरुणीला मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांच्याकडून अहवाल मागविल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी फक्त घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देतात. स्वतः काहीही निर्णय घेत नाहीत, अशी टीका भाजप नेते झफर इस्लाम यांनी केली.
भाजपचे आणखी एक नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सुद्धा या प्रकरणावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, देशात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेबद्दल मात्र मौन बाळगले आहे. या घटनेला इतके दिवस उलटून गेल्यानंतरही राहुल गांधी यांनी त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.