बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे तामिळनाडूत होत असलेला वादळी पाऊस रविवारीही सुरूच होता. येत्या २४ तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनाऱ्यावरील भागांत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे बळी गेलेल्या व्यक्तींची संख्या आता ५९ वर पोहोचली आहे. शुक्रवार-शनिवार दरम्यान कांचिपूरम जिल्ह्य़ात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिघांचा, तर वेल्लोर जिल्ह्य़ात अंगावर भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला. चेन्नईतही खोलगट भागांत पावसाचे पाणी साचले आहे. त्याचा शहरातील वाहतुकीवर आणि संचारव्यवस्थेवर परिणाम होत आहे. रेल्वे आणि वाहने अतिशय कमी वेगाने चालत होत्या. त्यामुळे नागरिकांना अपेक्षित स्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. बहुतेक नागरिक घरी राहणेच पसंत करीत आहेत.