करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन छत्तीसढ येथील रायपूरच्या उपजिल्हाधिकारी शीतल बन्सल यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. भारतीय वन विभागात काम करणारे अधिकारी आयुष आणि शीतल बन्सल यांचं लग्न आज होणार होतं. मात्र ते पुढे ढकलण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शीतल बन्सल यांनी ही माहिती दिली. आम्ही जर आज लग्न केलं तर समाजासमोर ते एक चुकीचं उदाहरण ठरेल. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा धोका टाळण्यासाठी गर्दी न होऊ देणं सगळ्यांच्या हिताचं आहे. नेमक्या याच कारणामुळे आम्ही आमचं लग्न पुढे ढकलत आहोत असंही त्या म्हणाल्या.

देशभरात ६०० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. काही जणांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश लॉकडाउन आहे. लग्न समारंभही मोजक्या लोकांमध्ये आटपा किंवा लग्न पुढे ढकला असं आवाहन सरकारतर्फे आधीच करण्यात आलं होतं. आता ते आवाहनही लोक पाळत आहेत हेच या उदाहरणावरुन दिसून येतं आहे.