देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था झाली आहे. अपुऱ्या वैद्यकीय यंत्रणेमुळे प्रशासनावर ताण पडत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडातून मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटरची खरेदी केली आहे. मात्र हे व्हेंटिलेटर खराब असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय आरोग्य खात्याकडून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे .

“भारत सरकारने राज्याला पीएल केअर्स फंडातून १९०० व्हेंटिलेटर दिले आहेत. हे व्हेंटिलेटर लावण्याची आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र या व्हेंटिलेटरर्समध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या तांत्रिक अडचणीमुळे रुग्णांच्या जीवाल धोका निर्माण होऊ शकतो”, असं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितलं आहे.

#AskKTR: प्रश्न जनतेचे उत्तरं मंत्र्याची… लॉकडाउनसंदर्भातील शंकाचं निरसन झालं थेट ट्विटरवरुन

“व्हेंटिलेटरमध्ये प्रेशर ड्रॉपची समस्या आहे. एक दोन तास सलग काम केल्यानंतर व्हेंटिलेटरर्स बंद पडत आहेत. यात पीआयओ २ मध्ये काही त्रुटी दाखवत आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजन सेन्सर आणि कम्प्रेशर फेल होण्याची समस्या दाखवत आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

राजस्थान व्यतिरिक्त मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही अशा समस्या समोर आल्याचं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितलं आहे. यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्य सरकारकडून दोन पत्र केंद्र सरकारला लिहिली आहेत. या पत्रातून खराब व्हेंटिलेटर्सच्या चौकशीची मागणी केली आहे.