Rajasthan Election 2018 : मी जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे, असे म्हणत राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पराभव मान्य केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. कारण भाजपाला ७४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा आकडा १५० च्या पुढे गेला होता आणि राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. यावेळी मात्र ९९ जागांवर काँग्रेसला निवडत राजस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. जनतेने जो कौल दिला आहे तो मला मान्य असून आम्ही राजस्थानच्या जनतेसाठी बरीच कामे केली आहेत. आता यापुढचे सरकार चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसतर्फे अशोक गहलोत, सचिन पायलट या दोघांनीही निवडणूक जिंकण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ठिकाणी सभा घेऊन राजस्थानच्या जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात ७ डिसेंबरला एकूण ७४.२१ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ४,७४,३७,७६१ मतदार असून एकूण ३३७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.